शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर(Gajanan Kirtikar) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत २२ आणि विधानसभेला १२६ जागा मिळाल्याच पाहिजेत असा दावा केला होता.
यावर भाजपा नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी शिंदे गटाला प्रत्युत्तर दिले आहे. मुनगंटीवार यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला असा टीव्हीवर ठरत नसतो अशा शब्दांत शिंदे गटाला सुनावलं आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, जागावाटपाचा फॉर्म्युला हा माईकवरून, पत्रकार परिषदेतून, टीव्ही चॅनेलवरून कधीच ठरत नाही. तर जागावाटपासाठी केंद्रात अमितभाई शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बसतील. जागावाटपाचा फॉर्म्युला पत्रकार परिषदेत ठरायला लागला, जाहीर सभेत ठरायला लागला तर हे काही पोषक वातावरण होऊ शकत नाही असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला.
त्या जागा शिंदे गटाला दिल्याच पाहिजेत…
जिथे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील त्या जागा त्यांनी घेतल्याच पाहिजेत आणि भाजपाने त्या त्यांना दिल्याच पाहिजेत. तसंच भाजपालाही त्यांच्या जागा मिळायला पाहिजेत. म्हणून जागावाटप हे काही टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून शंभर टक्के ठरणार नाही. कोणतंही राजकीय सूत्र हे तर्कसंगत ठरवावं लागतं असंही मुनगंटीवार म्हणाले.
गजानन कीर्तीकर काय म्हणाले होते ?
शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना काय कमजोर नाही असं भाजपला ठणकावलं आहे. तसेच लोकसभेला 22 आणि विधानसभेला 126 जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. काही जागांची अदलाबदल होऊ शकते, पण सूत्र बदलता कामा नये असा इशाराही कीर्तिकर यांनी भाजपला दिला आहे.
