बाळासाहेब थोरातांनी प्रवरा नदी काठी पूरस्थितीची केली पाहणी

अहमदनगर :- प्रवरा,आढळा व म्हाळुंगी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तीनही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून सर्व नागरिकांनी पूरस्थिती काळात अधिक सतर्क राहावे,असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून त्यांनी स्वत: संगमनेर मध्ये प्रवरा नदीकाठी जाऊन पूरस्थितीची पाहणी करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

प्रवरानदीकाठी साईनगर,नाईकवाडपुरा व प्रवरासंगम येथे जाऊन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी पूरस्थितीची पाहणी केली.यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधू न त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.त्याचबरोबर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी स्थानिक नागरिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की,धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तीनही नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.अशा काळामध्ये नागरिकांनी अधिक सतर्क रहावे.तरुणांनी नदीकाठी जाण्याचा किंवा सेल्फी घेण्याचा मोह टाळावा.याचबरोबर गणेशोत्सव काळातही अतिउत्साहीपणा न दाखवता अधिक काळजी घ्यावी असे आवाहन केले.याचबरोबर स्थानिक सर्व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.दुर्गा तांबे म्हणाल्या की,पूर स्थिती काळामध्ये तरुणांनी अति धाडस किंवा अति उत्साह दाखवू नये.त्याचप्रमाणे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी लहान मुलांनाही पालकांनी पाण्याकडे जाऊ देऊ नये तसेच तरुणांनी पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन केले.याप्रसंगी साईनगर मधील नागरिकांना जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पुलाची पाहणी ही आमदार थोरात यांनी केली.

Leave a Comment