मान्सूनने पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला असून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आज सोमवारी (ता. ७) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे या भागातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून अधून मधून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आयएमडीने जारी केलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वारे तयारी झाले आहेत. हळुहळू या वाऱ्यांची घुसळण होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस शक्यतो सायंकाळी किंवा रात्री पडण्याचा अंदाज आहे.
अशातच उकाड्यातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. कारण, आज (ता. ७) मुंबई ठाण्यासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांसह जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अल निनोचा प्रभाव संपल्यानंतर भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार, सप्टेंबर महिन्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र, त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
