महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीने मिळून जवळपास 230 जागा मिळवल्या आहेत. तर महाविकास आघाडीकडे जेमतेम 55 जागाही नसल्याचं चित्र आहे. तर इतरांना 5 जागा मिळाल्या आहेत. यानंतर आता राज्याला विरोधी पक्ष मिळणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव डॉ. अनंत कळसे यांनी संसदेतील नियमाची माहिती देताना सांगितले की, लोकसभा असो की राज्याची विधानसभा असो विरोधीपक्षनेतेपद मिळण्यासाठी त्या पक्षाला एकूण जागांचा दहा टक्के जागा मिळणे आवश्यक आहे.
आताची परिस्थिती पाहिली तर विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेस 20, शिवसेना उबाठा 19 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 13 जागा मिळत आहे. तिघांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी 28 चा जादूई आकडा गाठता येणार नाही. त्यामुळे राज्यात आता विरोधीपक्षनेतेपद नसणार आहे.
