राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल दरात थेट 50 टक्क्यांची कपात करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या सुधारित नियमानुसार टोल दर मोजण्याची पद्धतच बदलण्यात आली असून याचा थेट फायदा वाहनचालकांना मिळणार आहे.
2008 च्या राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये सुधारणा करत मंत्रालयाने एक नवं सूत्र लागू केलं आहे. यामध्ये पूल, बोगदे, उड्डाणपूल किंवा उन्नत रस्ते यांसारख्या महागड्या रचनेवर पूर्वीप्रमाणे जास्त टोल आकारला जाणार नाही. आता नवीन गणितानुसार टोल दर मोजले जाणार आहेत, त्यामुळे या मार्गांचा वापर करणाऱ्यांना अर्धा टोल भरावा लागणार आहे.
हवामान, इंधन दर आणि इतर खर्चांमुळे प्रवास आधीच महाग झाला असताना ही सवलत वाहनधारकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. नव्या सूत्रानुसार टोल शुल्क हे दोन आधारांवर मोजले जाणार आहे:
– संरचनेच्या लांबीच्या 10 पट
– राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण लांबीच्या 5 पट
या दोघांपैकी जे कमी असेल, त्यानुसार टोल दर आकारले जातील. उदाहरणार्थ, जर एखाद्या महामार्गाची लांबी 40 किमी असेल, तर पूर्वी 400 किमीच्या गणनेवर टोल घेतला जात होता. आता मात्र त्याऐवजी केवळ 200 किमीच्या आधारावर टोल आकारला जाईल. म्हणजेच थेट 50 टक्क्यांची सवलत मिळणार आहे.
या आधी महामार्गावर जर एखादं महागडं बांधकाम असलं (उदाहरणार्थ, पूल किंवा बोगदा), तर त्यावर प्रति किलोमीटर 10 पट टोल आकारला जात असे. हे टोल दर सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच भार टाकणारे होते. मात्र आता सुधारित नियमामुळे या आर्थिक बोज्यावर दिलासा मिळणार आहे.
नवीन नियम 15 जुलैपासून लागू होण्याची शक्यता असून, त्यानंतर सर्वाधिक महाग मार्गांवरही वाहनचालकांना अर्ध्या टोल दराने प्रवास करता येईल.
