ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याचं राजकीय समीकरण बदलल्याची चर्चा होत असताना भाजप नेत्याने ठाकरे गटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
या आमदार आणि खासदारांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जराही विश्वास नाही, असं म्हणत गिरीश महाजन यांनी ठाकरेंना पलटीबहाद्दर म्हटलं.
मीडिया रिपोर्टनुसार, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शनिवारी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावर येत सरकारवर टीकेचे बाण सोडले. ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर भाजपकडूनही पलटवार सुरू झाला आहे. महाजन यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हटलं की, ‘त्यांची भूमिका अपरिपक्व असते. ठाकरेंचे अनेक खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. माझ्यावर विश्वास नसेल, तर तुम्हाला लवकरच सत्य समजेल. ठाकरेंच्या खासदार आणि आमदारांना त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी वडील बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विसरले. त्यामुळे राजकीय भविष्य बरबाद केलं’.
महाजन यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हटलं की, ‘पहिलीपासून हिंदी सक्ती लागू करण्याचा निर्णयाचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या काळात पारित झाला. कॅबिनेटच्या प्रस्तावावर त्यांची सही आहे. आता तेच त्यांच्या निर्णयाला विरोध करत आहेत. त्यांनी स्वत:च्या निर्णयावरून यू-टर्न घेतला आहे. ठाकरे फक्त विरोधाला विरोध करत आहेत’. महाजन यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहावे लागेल.
