नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ६ पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे १९,१४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, दोन वर्षांच्या कालावधीत बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा प्रकल्प BOT (टोल) पद्धतीने राबवला जाणार आहे.
या कॉरिडॉरमुळे नाशिक आणि सोलापूरसह मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण अधिक गतिमान होणार असून, प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच औद्योगिक, कृषी आणि व्यापारी विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
या महामार्गामुळे नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या शहरे थेट जोडणार त्यामुळे दळणवळण सुलभ होणार आहे. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कुठे कुठे महामार्ग जोडणार जाणार?
नाशिक ते अक्कलकोट हा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर वाढवण बंदर इंटरचेंजजवळील दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे, नाशिकजवळील आग्रा-मुंबई कॉरिडॉर (NH-60, अदेगाव जंक्शन) तसेच समृद्धी महामार्ग (पांगरी, नाशिकजवळ) यांच्याशी जोडला जाणार आहे. या मार्गामुळे पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व किनारपट्टीपर्यंत थेट संपर्क उपलब्ध होणार आहे.
या महामार्गामुळे NICDC अंतर्गत विकसित होत असलेल्या कोप्पारथी आणि ओरवाकल या औद्योगिक नोड्ससाठी मालवाहतुकीची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच, नाशिक-तळेगाव दिघे हा टप्पा पुणे-नाशिक एक्स्प्रेसवेच्या गरजेलाही पूरक ठरणार असून, हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारकडून स्वतंत्रपणे पुढे नेला जात आहे.
वाहतूक कोंडी फुटली, इंधनाचा खर्च वाचेल तसेच वेळेचीही बचत होणार
हा उच्चगती, सुरक्षित आणि सलग वाहतूक देणारा महामार्ग असल्याने अपघातांचे प्रमाण कमी होईल, वाहतूक कोंडी घटेल आणि इंधनाचा खर्च वाचेल तसेच वेळेचीही बचत होईल. विशेषतः नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला यामुळे मोठा चालना मिळणार आहे.
अडीच ते तीन कोटी लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार
या 6 पदरी, अॅक्सेस-कंट्रोल्ड महामार्गावर 100 किमी प्रतितास डिझाइन स्पीड ठेवण्यात आला असून, सरासरी वाहनगती 60 किमी प्रतितास राहणार आहे. या प्रकल्पामुळे थेट अडीच कोटी लोकांना प्रत्यक्ष रोजगार तर सव्वा तीन कोटी लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
