जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. साकरी गावातील एका तरुणाने भरदिवसा शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलून दिलं आहे.
दोन्ही मुली इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकत होत्या. घटनेच्या दिवशी मंगळवारी सकाळी दोघीही नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी (ट्यूशन) जात होत्या. याच वेळी दबा धरून बसलेल्या आरोपीनं दोघींना विहिरीत फेकलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, साकरी गावातील या दोन मुली मंगळवारी सकाळी आपल्या घरापासून शिकवणीला जाण्यासाठी निघाल्या होत्या. मुली गावालगतच्या शेताजवळून जात असतानाच, दबा धरून बसलेल्या संशयित माथेफिरूने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना जबरदस्तीने पकडून विहिरीजवळ नेलं आणि त्यांना ढकलून दिलं. हा प्रकार घडत असताना मुलींनी आरडाओरडा केला, ज्यामुळे जवळच्या शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांचे लक्ष गेले.
ग्रामस्थांची धाव आणि रेस्क्यू ऑपरेशन
घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पाणी असल्याने मुलींचा जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. दोरखंड आणि शिडीच्या सहाय्याने मुलींना सुरक्षित बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
संशयित रोहन चौधरी पोलिसांच्या ताब्यात
या घटनेनंतर भुसावळ पोलिसांनी तत्परता दाखवत गावातीलच संशयित माथेफिरू रोहन चौधरी याला ताब्यात घेतले आहे. या तरुणाने अशाप्रकारे विकृत पाऊल का उचलले? याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. जुना वाद, एकतर्फी प्रेम की अन्य काही मानसिक विकृती यामागे आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
