राज्यात आता प्रचंड उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअस पार करून चाळीशी गाठतानाचे चित्र आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यभर उष्णतेचे अलर्ट दिले आहेत.
मुंबई, पालघर ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उष्ण व आर्द्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. पुढील दोन दिवस राज्यभरात कमाल तापमानात वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलंय. विदर्भात पुढील दोन दिवसात पारा तापणार असून तीन जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा बसणार आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे. महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा 40° च्या पुढे जाईल असा अंदाज हवामान तज्ञ एस. डी सानप यांनी वर्तवला आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पुढील सात दिवस तापमानाचा पारा हा दोन ते तीन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई कोकण या किनारपट्टीचा भागात 8 आणि 9 मार्च रोजी उष्ण आणि आर्द्र तापमानाची शक्यता आहे. तसा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
आज सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली. 40.8°c तापमान अमरावतीत नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील तापमान हे 36 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भात पुढील दोन दिवस तापमानाचे हाय अलर्ट दिले आहेत. अकोला,अमरावती आणि वर्ध्यात पुढील दोन दिवस पारा चाळीशी पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वर्धा,अकोला आणि अमरावतीला पुढील दोन दिवसांसाठी उन्हाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यात तापमान सामान्य पेक्षा 5 अंश सेल्सियसने जास्त राहील. तर विदर्भातील इतर जिल्ह्यात तापमान सामान्य पेक्षा 2 ते 3 अंश सेल्सियस जास्त राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे . पुढील दोन दिवस विदर्भातील उर्वरित जिल्ह्याचे तापमान 38 ते 40 अंश राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
