कॅप्टन खरात प्रकरणात विखे पाटलांचा धक्कादायक खुलासा, नगर जिल्ह्यात उडाली खळबळ

शिर्डी – स्वतःला ज्योतिष आणि भविष्यवेत्ता म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पापुद्रे आता सोलले जात आहेत. महिलांचे शोषण आणि हायप्रोफाईल व्यक्तींना जाळ्यात ओढणाऱ्या या भोंदूच्या कुकर्माची व्याप्ती आता थेट शिर्डीपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी अत्यंत मोठे वक्तव्य केले आहे, यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणावर बोलताना स्पष्ट केले की, कॅप्टन खरातने ज्या प्रकारे लोकांचे शोषण केले आहे, त्याचे धागेदोरे खूप खोलवर आहेत. राहाता तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित लोक या भामट्याचे शिकार झाले आहेत, मात्र बदनामीच्या भीतीने अनेक जण समोर यायला घाबरत आहेत.

विखे पाटील यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, माझा अशोक खरातशी कधीही संबंध आलेला नाही, मी त्याला कधी भेटलो नाही किंवा त्याच्याशी माझे कधी बोलणेही झाले नाही. पोलीस तपासात लवकरच सर्व सत्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 वर्षांत या भामट्याने तब्बल 200 कोटी रुपयांची माया जमवली आहे. ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने त्याने सिन्नर, शिर्डी आणि कोपरगाव परिसरात मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधींच्या जमिनी खरेदी केल्या आहेत.

विशेष म्हणजे, शिर्डीतील एका अतिशय महत्त्वाच्या आणि पंचतारांकित भागात खरातच्या नावावर 4 एकरचा भूखंड आहे, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे 50 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. एका सामान्य ज्योतिष सांगणाऱ्या व्यक्तीकडे इतकी अफाट संपत्ती आली कुठून, याचे कोडे आता पोलीस उलगडत आहेत.

शिर्डी पोलिसांनी 18 फेब्रुवारी रोजी खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला होता. एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांचे अश्लील फोटो तयार करणे, त्यांना धमकवणे आणि ब्लॅकमेल करणे असे गंभीर प्रकार या टोळीने केले आहेत. हायप्रोफाईल महिलांना आणि श्रीमंत व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची कुंडली सांगण्याच्या नावाखाली हे किळसवाणे कृत्य केले जात होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता हा तपास एसआयटी (SIT) कडे वर्ग करण्यात आला आहे.

सध्या शिर्डी पोलीस उपअधीक्षक या प्रकरणाचे मुख्य तपासी अधिकारी असून, तपासाच्या कामासाठी ते नाशिकला गेले असल्याची माहिती मिळत आहे. एसआयटीच्या माध्यमातून आता खरातच्या संपत्तीचे स्रोत आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर मोठ्या माशांचा शोध घेतला जात आहे. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विधानानंतर आता राहाता तालुक्यातील ते नामांकित पीडित लोक कोण आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या प्रकरणातून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

Leave a Comment