महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या निकालात मुलींनीच वर्चस्व गाजवले आहे. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला.
पुणे, मुंबईसह अनेक विभागांचा निकाल समाधानकारक लागला आहे. सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना https://mahahsscboard.in/ अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. (MSBSHSE result) राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
निकालाची महत्त्वाची आणि ठळक वैशिष्ट्ये काय?
राज्याचा एकूण निकाल: ८९.७९%
मुलींचा निकाल: ९३.१५ %
मुलांचा निकाल: ८६.८० %
सर्वात जास्त निकाल असलेला विभाग : कोकण
कोणत्या विभागाचा निकाल किती लागला?
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागातून १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये कोकण विभागाने आपला दबदबा कायम राखला. मुंबई आणि पुणे विभागाचा निकालही चुरशीचा लागला आहे.
पुणे ९१.२५
नागपूर ८८.६७
छत्रपती संभाजीनगर ८८.६८
कोल्हापूर ८९.९७
अमरावती ९०.९२
नाशिक ९०..७२
लातूर ८४.१४
कोकण ९४.१४
मुंबई ९०.०८
निकाल कुठे पाहायचा?
विद्यार्थी आपला निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात:
mahahsscboard.in
hscresult.mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
बारावीचा निकाल कसा पाहाल?
वरील पैकी कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटवर जा
‘HSC Examination Result 2025’ या लिंकवर क्लिक करा
तुमचा सीट नंबर किंवा रोल नंबर टाका
तुमच्या आईचे पहिले नाव टाका
‘View Result’ वर क्लिक करा
तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआऊट तुम्ही घेऊ शकता
डिजीलॉकर मार्कशीट –
निकाल लागल्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना डिजीलॉकरवर (DigiLocker) डिजिटल मार्कशीट पाहता येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करावा लागणार आहे. डिजीलॉकर ॲप किंवा वेबसाइटवरून बारावीचे विद्यार्थ्यांना मार्कशीट डाऊनलोड करता येईल.
निकालानंतर पुढे काय?
जर तुम्हाला आपल्या गुणांची पडताळणी (Verification) करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत हवी असेल. तर बोर्डाकडून लवकरच ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तसेच, अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा (Supplementary Exam) जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येईल.
