राज्यात कडाक्याच्या उन्हाने नागरिक हैराण झाले असतानाच आता हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एप्रिलच्या अखेरीपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी उष्णतेची लाट जाणवत आहे. मात्र आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस हे वातावरण कायम राहणार असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये उकाडा कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज २ मे रोजी कोकण-गोवा परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात उष्णतेचा तडाखा काही प्रमाणात कमी जाणवू शकतो. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज असून तापमानात विशेष घट होण्याची शक्यता नाही. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुपार आणि संध्याकाळच्या सुमारास आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, ३ मेपासून राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ३ ते ५ मे दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काढणीस आलेली पिके सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
