मोठी बातमी! इंद्रायणी नदीला पूर ; आळंदीकडे येऊ नका, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन

पुणे : आषाढी वारी २०२६ निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीकडे येऊ नये, असे तातडीचे सार्वजनिक आवाहन केले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आळंदी शहरात प्रवेश करणे सुरक्षित नसून, ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे.

तसेच पोलीस, महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, नदीपात्र, घाट परिसर तसेच पाण्याखाली गेलेल्या पुलांकडे जाणे टाळावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment