तुम्ही लग्नाळू असाल आणि दलालांच्या माध्यमातून वर किंवा वधूचा शोधत असाल तर सावध व्हा. कारण दलालाच्या माध्यमातून लग्न लावलं आणि नवरी लग्नाच्या पहिल्याच रात्री घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना मुंबई पश्चिम उपनगरातील मालाड परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
लग्नानंतर हनिमूनचं स्वप्न पाहणाऱ्या नवरदेवाच्या नशिबात मात्र भलतंच काहीतरी लिहिलं होतं. हनिमूनच्या रात्रीच नव्या नवरीने घरातील दीड लाख रुपये आणि चार तोळे सोने घेऊन पोबारा केल्याची घटना मालाड इथे घडली आहे.
यामुळे नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांचा लग्न झाल्याचा आनंद जास्त वेळ टिकला नाही. याबाबत त्यांनी मालाड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आता दलाल कमलेश कदम याला अटक केली असून पळून गेलेल्या नवरीचा शोध पोलीस घेत आहेत.
दीड लाख रुपये आणि चार तोळे सोनं घेऊन नवी नवरी पसार
मालाड परिसरात राहणाऱ्या वृषभ मेहता या तरुणाचं लग्न जमत नव्हतं. यासाठी त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी लग्न जुळवून देणाऱ्या कमलेश कदम या दलालाची भेट घेतली. कमलेशने 15 हजार रुपये घेऊन त्याची आशा गायकवाड नावाच्या या 30 वर्षीय तरुणीशी भेट घडवून दिली.
गाठीभेटी आणि बोलणी झाल्यानंतर ऋषभ मेहता आणि आशा गायकवाड यांचं लग्न लावून दिलं. मात्र हनिमूनच्या रात्रीच या नव्या नवरीने मेहता कुटुंबीयांना जबरदस्त धक्का दिला. या नवरीने घरातील दीड लाख रुपयांची रोख रक्कम आणि चार तोळे सोने घेऊन पोबारा केला, अशी माहिती मालाड पोलिसांनी दिली.
दलाल अटकेत, नवरीचा शोध सुरु
यासंदर्भात मेहता कुटुंबीयांनी मालाड पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. या प्रकरणी मालाड पोलिसांनी लग्न जुळवून देणारा दलाल कमलेश कदम याला अटक केली आहे.
तर फरार नवरीचा शोध मालाड पोलीस घेत आहेत. सध्या दलाल कमलेश कदम मालाड पोलिसांच्या ताब्यात असून त्याने अशाप्रकारे किती लोकांची लग्नात जुळवून दिले तसंच तिची जणांची फसवणूक केली याबाबत अधिक तपास मालाड पोलीस करत आहेत.
