Asia Cup 2023 : सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसाने भारत पाक सामन्यावर विरजण टाकलं असताना आज भारतीय चाहत्यांना एक दिलासादायक आनंदाची बातमी मिळाली. विराट कोहली आणि दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या लोकेश राहुलच्या शतकी खेळीने आज कोलंबोत ऐतिहासिक विजय नोंदविला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी धमाल केली. पाकिस्तानला नमवत भारताने हा विजय साजरा केला.
भारताचे 356 धावांचे ओझे पाकिस्तानाला पेलवले नाही. आधीच या ओझ्याखाली दबल्याने पाकिस्तानचा संघ अर्धमेला झाला होता. भारतीय गोलंदाजानी पाकिस्तानी फलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. भारताने हा सामना जिंकून सुपर ४ मध्ये खात्यात २ गुण जमा केले अन् फायनलच्या दिशेने पाऊल टाकले.
रविवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुपर-४चा सामना खेळला जात होता. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पावसामुळे भारतीय डावात व्यत्यय आला आणि सामना राखीव दिवसापर्यंत पुढे ढकलण्यात आला. सोमवारी, सामना भारतीय डावाच्या २४.१ षटकांपासून सुरू झाला आणि भारताने पाकिस्तानला ३५७ धावांचे लक्ष्य दिले.
रोहित शर्मा ( 76) व शुबमन गिल (58) यांनी काल १२१ धावांची भागीदारी करून पाया मजबूत केला होता अन् आज विराट व लोकेश यांनी शतकं झळकावून त्यावर धावांचा कळस चढविला. पाकिस्तानविरुद्ध भारताने 2 बाद 356 धावा केल्या. विराट कोहलीने 94 चेंडूत 9 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 122 धावा केल्या आणि लोकेश राहुल 106 चेंडूत 12 चौकार व 2 षटकारांसह 111 धावांवर नाबाद राहिला.
प्रत्युत्तरात पाकिस्तानला जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांनी सुरुवातीला धक्के दिले. इमाम उल हक (9) आणि बाबर आजम ( 10) माघारी परतल्यानंतर शार्दूल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकात मोहम्मद रिझवानला ( 2) माघारी पाठवले.
सोमवार हा सामन्याचा राखीव दिवस होता. पुढे खेळताना भारतीय संघाने 50 षटकात 356 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाला 32 षटकांत आठ गडी गमावून केवळ 128 धावा करता आल्या. नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. अशा प्रकारे टीम इंडियाने 228 धावांनी विजय मिळवला.
