आमदार अपात्रतेवर भाजपा नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ईश्वर हे कल्याणच करतो. त्यामुळेच आपल्याला ईश्वराचं अस्तित्व मान्य आहे. २९ जून २०२२ रोजी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता ३० तारखेला ते विश्वासदर्शक प्रस्तावाला सामोरे गेले असते आणि त्यांनी व्हीप काढला असता तर मात्र तांत्रिक दृष्टीकोनातून अनेक प्रश्न जन्माला आले असते. परंतु, त्यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे तसे काही प्रश्न उपस्थित होत नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी दिलेल्या निकालपत्रात म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिल्याने त्यांचं सरकार पुन्हा बसवता येणार नाही.
तसेच सरन्यायाधीशांनी राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कारभारावर बोट ठेवलं होतं. यासह आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांवर सोपवला होता. याप्रकरणी आता सुनावणी सुरू आहे.
