लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणता पक्ष वरचढ ठरणार, वाचा सर्व्हे…..

लोकसभेच्या निवडणूका जवळ येत आहेत तसे वेगवेगळ्या संस्थांकडून जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात देखील असाच एक सर्व्हे करण्यात आला असून याचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले.

या सर्व्हेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील ‘एनडीए’साठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तर काँग्रेस, शिवसेना(यूबीटी) आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स यांनी संयुक्तरित्या हा सर्व्हे केला आहे.

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांवर ३२ टक्के मतं घेत भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. तर शिवसेना (शिंदे गट) १० आणि अजित पवार यांच्या गटाला ५ टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसचा फक्त १५ टक्के व्होट शेअर असेल, तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गटाला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देखील अत्यंत कमी मतं मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शरद पवार गटाला १२ टक्के मते मिळतील तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १५ टक्के मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर ११ टक्के मते इतरांच्या पदरात पडतील.

व्होट शेअरनुसार कोणाला किती जागा मिळणार याबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपला सर्वाधिक २२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर त्या खालोखाल शिवसेना शिंदे गट चार राष्ट्रवादीचा अजित पवार गट दोन जागा मिळतील. तर काँग्रेसला ९ आणि शरद पवार गटाला तीन जागा मिळतील.

त्यामुळे मागच्या निवडणूकीपेक्षा काँग्रेसला आठ जागा जास्त मिळताना दिसत आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेला देखील दोन जागांचा फायदा होताना दिसतो आहे. ठाकरेंची शिवसेना या निवडणूकीत ८ जागा जिंकू शकते. तर इतरांना एक जागेवर समाधान मानावे लागणार असा अंदाज आहे.

Leave a Comment