बाळासाहेब थोरातांनी दिंडीच्या अपघाताचा मुद्दा अधिवेशनात घेताच मुख्यमंत्र्यांनी थेट…..

नागपूर : कार्तिकी वारीसाठी आळंदीकडे निघालेल्या शिर्डीतील वारकऱ्यांच्या दिंडीत संगमनेर तालुक्यातील नाशिक – पुणे महामार्गावरील घारगाव जवळ कंटनेर घुसला होता. त्यात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर दहा वारकरी जखमी झाले होते.

दरम्यान, या अपघातात बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी. ता. कोपरगाव), पालखीचे चोपदार बबन पाटीलबा थोरे (रा. शिर्डी), भाऊसाहेब नाथा जपे (रा. कनकुरी, ता. राहाता), आणि ताराबाई गंगाधर गमे (रा. कोर्हाळे, ता. राहाता) यांचा मृत्यू झाला. तर बिजलाबाई शिरोळे, राजेंद्र सरोदे, भाऊसाहेब गायकवाड, ओंकार चव्हाण, निवृत्ती डोंगरे, शरद चापके, अंकुश कराळ आणि मीराबाई ढमाले हे जखमी झाले.

दरम्यान त्याबाबतचा मुद्दा आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री शिंदेंनीही तातडीने मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांचा वारसांना प्रत्येक पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली.

हिवाळी अधिवेशनात काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत वारकऱ्यांना मदत देण्याबाबतची घोषणा करावी, अशी मागणी केली. ते म्हणाले की, कार्तिकी वारीसाठी शिर्डीचे वारकरी आळंदीकडे निघाले होते. संगमनेर तालुक्यातील घारगावमधील खंदरमाळ येथे त्या दिंडीत एक ट्रक घुसला. त्यात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर दहा वारकरी गंभीर जखमी झाले.

त्या वारकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन आलो आहे. काहींच्या घरातील कर्ता माणूस गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीय हादरून गेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या मदतीची घोषणा करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

आमदार थोरात यांनी मागणी करताच मुख्यमंत्री शिंदे यांनी उठून मदतीची घोषणा केली. बाळासाहेब थोरात यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत गंभीर आहे. आळंदीकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत एक ट्रक घुसला. त्यात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच, जे वारकरी जखमी झाले आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Leave a Comment