नागपूर : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप स्वतः रोहित पवार यांनी केला आहे. विविध मागण्यांसाठी विधानसभेकडं निघालेल्या रोहित पवारांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतलंय. त्यामुळं एकच गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.
आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला. त्यानंतर रोहित पवार यांनी राज्य सरकारकडं काही मागण्या केल्या. या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारकडून जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्यानं रोहित पवार, तसंच युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही न आल्यानं रोहित पवार कार्यकर्त्यांसह विधानभवनाकडं निघाले होते. त्यावेळी पोलीस तसंच कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला आहे. कार्यकर्त्यांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी काही प्रमाणात लाठीचार्ज केला असा आरोप होत आहे.
युवा संघर्ष यात्रेच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा झिरो माईल चौकात पोहोचला होता. यावेळी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी पोलिसांनी रोहित पवार यांना रोखलं. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी रोहित पवार यांना ताब्यात घेतलं. रोहित पवार यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
रोहित पवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “राज्यात तरुणांच्या समस्या आहेत, आरोग्य व्यवस्था डळमळीत आहे, एमपीएससी परीक्षेशी संबंधित प्रश्न आहेत, शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे, या सर्व समस्यांमुळं आम्हाला डावलण्यात आलं आहे. या बाबींचं निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही जबाबदार व्यक्ती आली नाही, त्यामुळं आम्ही हे निवेदन घेऊन जात असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. आमदारांचं कोणी ऐकत नसेल, तर सर्वसामान्यांचं कोण ऐकणार? हे सरकार भ्याड आहे. या सरकारला अहंकार आहे, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
