समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आज होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन होणार आहे.
भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचा हा तिसरा टप्पा असून, आज सकाळी 11 वाजता इगतपुरी प्लाझा येथे मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण होणार आहे.
राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यान समृध्दी महामार्ग तयार करण्यात होत असून आतापर्यंत सहाशे किलोमीटरचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. महामार्गाचे सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले असून आता भरवीर ते इगतपुरी हा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कधी होणार याबाबत चर्चा सुरू होती.
आज हा महामार्ग प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. दादा भुसे यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ राहणार असून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील 24.872 किलोमीटर लांबीचा हा मार्ग एकूण 16 गावांमधून जात आहे. या तिसऱ्या टप्प्यासाठी अंदाजे 1078 कोटी रुपये खर्च आला असून या लोकार्पणामुळे 701 किमीपैकी 625 किमी लांबीचा रस्ता आता वाहतुकीसाठी उपलब्ध झाला आहे.
समृद्धी महामार्गाचे (इगतपुरी ते आमणे) उर्वरित काम सुरू आहे. या महामार्गामुळे ठाणे, मुंबई परिसरातून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर आणि जलद होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना 1 तासात शिर्डी गाठता येणार आहे.
या व्यतिरिक्त, नाशिक जिल्ह्यातील शिर्डी, अहमदनगर, सिन्नर आणि इगतपुरी भागातील शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाची वाहतूक करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात ये-जा करण्यासाठी कमी वेळ लागेल.
