पारनेर – दहा वर्षे मुख्यमंत्री आणि पंधरा वर्षे केंद्रात मंत्री असतानाही नगर जिल्ह्यासाठी एकही काम जेष्ठ नेते करु शकले नाही आता त्यांनी दिलेला उमेदवार तरी आता काय करणार असा सवाल महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला. माझ्याकडे सांगण्यासाठी विकास कामे आहेत, समोर मात्र फक्त दहशत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
पारनेर येथे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथ प्रमुखांच्या संवाद कार्यक्रमात खा.डॉ.विखे पाटील बोलत होते.
खा. विखे पाटील म्हणाले की, देशात पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर येणार आहे. परंतू ज्यांनी फक्त राज्यात दहा उमेदवार उभे केले आहेत असे जेष्ठ नेते मोठमोठे स्वप्न पाहात आहेत. असा टोला लगावून ज्यांच्या मतदार संघातील साठ टक्के निधी परत गेला अशा खासदारांना संसदरत्न पुरस्कार मिळतो हे आश्यर्चकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
या तालुक्यातील दहशत आता जनताच संपवेल असा विश्वास व्यक्त करुन, माझ्याकडे सांगण्यासाठी फक्त विकासकामे आहेत, इतरांसारखी गुंडगीरी आणि दहशत नाही, मागील पाच वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ मी सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत. कोणी कितीही धमक्या दिल्या तरी, आपण त्याला घाबरत नाही. या तालुक्यातील जनताच या धमक्यांना आता उत्तर देईल असा इशाराही त्यांनी दिला.
