संगमनेर – तालुक्यातील वेल्हाळे गावात शेततळ्यात बुडवून आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 25 जुलै) दुपारी घडली आहे. शिवाजी आत्याबा सोनवणे (वय 66) आणि त्यांचा नातू समर्थ नितीन सोनवणे (वय 3) अशी मृतांची नावे आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की दुपारी मयत शिवाजी सोनवणे हे त्यांच्या शेततळ्याजवळ फवारा मारायचे काम करत होते. त्याचवेळी घरी पाहुणे आले म्हणून नातू समर्थ हा आजोबांना बोलवण्यासाठी शेततळ्याजवळ गेला, अचानक त्याचा पाय सरकल्याने तो शेततळ्यात पडला. याकडे आजोबांचे लक्ष जाताच समर्थला वाचवण्यासाठी आजोबा शिवाजी सोनवणे यांनीही शेततळ्यामध्ये उडी मारली. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच असल्याने दोघांचाही शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती समजतात त्यांचा मुलगा नितीन सोनवणे यांनी आसपासच्या नागरिकांना आवाज दिला. यावेळी माजी सरपंच गोरक्ष सोनवणे, संदीप सोनवणे, शांताराम सोनवणे, भागवत सोनवणे, दिनकर सोनवणे, मारुती सोनवणे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर इतरांच्या मदतीने दोघांना शेततळ्यातून बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले. परंतु, उपचारांपूर्वीच दोघांनाही डॉक्टरांनी मयत असल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने वेल्हाळे गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
