शिंदे सरकारकडून लाडक्या भावांना आनंदाची बातमी, दरमहा १० हजार….

शिंदे-फडणवीस सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सुरूवातीचे दोन हप्ते जमा झाल्यानंतर राज्यभरात महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच आता शिंदे सरकारच्या वतीने लाडक्या भावांना देखील आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेनंतर रुजू झालेल्या युवकांना आता विद्यावेतनाचे दरमहा 10 हजारांची रक्कम देखील त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे, अशी माहिती कौशल्य-रोजगार-उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

 

10 सप्टेंबरपर्यंत मिळणार रक्कम

महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत राज्यात 1 लाख 10 हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी 60 हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त युवकांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून 8 हजार 170 आस्थापनांमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन 10 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मिळणार आहे, असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

 

2 लाखाहून अधिक युवकांची नोंदणी

भविष्यातील रोजगाराची आव्हाने ओळखून युवकांना कार्य प्रशिक्षण देऊन, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली होती. या योजनेमध्ये सरकारी तसेच खासगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी 8 हजार 170 आस्थापनांनी नोंदणी केली आहे. तसेच 2 लाख 21 हजार 244 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली आहे.

 

शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्रतिसाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली’मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेला फक्त शहरी विभागातच नाही तर ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसरी बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि त्या खालोखाल अमरावती विभागाने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 5 हजार युवा रुजू झालेले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन 10 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मिळेल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

 

10 लाख युवकांना प्रशिक्षणाचे उदिष्ट्ये

या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. ही योजना वर्षभर सुरु राहणार असून या योजनेमार्फत 10 लाख युवांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठरलेले आहे.सर्वसमावेशक अशी ही योजना महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी आणली असून युवकांनी आणि उद्योगांनी देखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येणार असल्याचे लोढा म्हणाले.

Leave a Comment