मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानच ठाकरे सरकार कोसळले, ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस यांची संमती आणि आदेशानंच राज्यातील उद्धव ठाकरे सरकार कोसळलं होतं, असा मोठा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळंच महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आम्हाला यश मिळालं, असंही तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता यावरून ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.

एका कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरोधात पहिली बंडखोरी मी केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीनं धाराशीवच्या जिल्हा परिषदेत आम्ही भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आम्ही शिवसेनेतील आमदारांचं मन वळवण्यास सुरुवात केली.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तब्बल १५० बैठका घेतल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आला आणि आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात यश आलं, असा मोठा गोप्यस्फोट मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यामुळं आता सावंतांच्या वक्तव्यामुळं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

मंत्री असताना चांगलं काम करूनही महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर पाय ठेवणार नसल्याची शपथ घेतली होती, असंही सावंत यांनी म्हटलं आहे. तानाजी सावंत हे धाराशीव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांची आरोग्यमंत्रीपदावर वर्णी लागली. त्यामुळं आता त्यांच्या वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Leave a Comment