नागपुरातून एक मोठी आणि अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघे जण राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोवाड गावात ही घटना घडली आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मृतकांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. चौघांनीही सामूहिक आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील नरखेड तालुक्यातील मोवाड गावात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. पती, पत्नी आणि दोन मुलांनी मिळून सामूहिक आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या चौघांनी इतके टोकाचं पाऊल का उचललं आणि या आत्महत्येमागचं नेमकं कारण काय आहे? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.
मिळालेल्या माहितीनुसार, मोवाड गावात राहणारे 68 वर्षीय विजय पचोरी, त्यांची पत्नी मालाबाई पचोरी (55 वर्षे), मुलगा दीपक पचोरी (38 वर्षे) आणि गणेश पचोरी (वय 38 वर्षे) हे चौघेही मृतावस्थेत आढळून आले आहेत. विजय पचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. मृतकांपैकी तिघांचे मृतदेह हे हात – पाय बांधलेल्या अवस्तेत आढळून आले आहेत तर एकाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आळा आहे. यामुळेच ज्या व्यक्तीने गळफास घेतला त्या व्यक्तीने आधी तिघांचे हात-पाय बांधून त्यांना फाशी दिली असावी मग स्वत: गळफास घेतली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याने गावातच नाही तर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांनी घडलेला प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली.
पोलिसांनी घटनास्थळावरचा पंचनामा करुन चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. चौघांच्या आत्महत्ये मागे नेमकं कारण काय आहे याबाबतचा पोलीस तपास करत आहेत. तसेच ही सामूहिक आत्महत्या आहे की, घातपात आहे? याबाबतही पोलीस तपास करत आहेत
