संगमनेर : भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 8 तास ठिय्या मांडला. यामुळे विखे-थोरात कुटुंबियातील वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले. आता यावर सुजय विखे यांच्या मात्रोश्री शालिनी विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
शालिनी विखे पाटील म्हणाल्या की, वसंतराव देशमुख यांनी वापरलेल्या शब्दांचा एक महिला म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आम्ही निषेध करतो. कोणाची जरी मुलगी असली तरी असं वाक्य कोणतीही महिला सहन करू शकत नाही आणि असं बोलण्याचाही अधिकार कोणाला नाही. कोणीही पातळी सोडून अशी वक्तव्य करू नये. प्रत्येकाच्या कुटुंबातील प्रश्न जो तो सोडवत असतो.
कालच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. हा सुजय विखे विरोधात जीवे मारण्याचा पूर्व नियोजित कट होता हे काल दिसून आलं. कुत्रा हाकलायचं म्हटलं तरी काठी सापडावी लागते. मात्र यांच्या गाड्यांमध्ये काठ्या होत्या, हे पोलिसांना समजलं आहे. कुणी गाड्या जाळल्या? कोण-कोण होतं हे सगळं माहित आहे.
आमच्या युवकांना झालेली मारहाण चुकीची आहे. राजकारण करताना कोणीही एवढ्या खालच्या पातळीला जाऊ नये. विकासाच्या मुद्द्यावर उत्तर देण्याऐवजी तो डोक्यावर पडलाय हे बोलणं कितपत योग्य आहे. सुजयच्या भाषणातून कोणतीही अशी टीका झालेली नाही. कालची घटना पूर्व नियोजित कट होता. खालच्या पातळीवर जाऊन जे राजकारण सुरू आहे ते बंद करावे.
