काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अहमदनगरमध्ये तणावाचे वातावरण आहे. वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करत राज्यभरतातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावरून वसंत देशमुखांसह सुजय विखे- पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजपचा निषेध केला जात आहे. यावर आता सुजय विखे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ‘मला जीवे मारण्याचा कट होता.’, असा खळबळजनक दावा सुजय विखेंनी केला आहे.
सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, ‘सभेतील झालेलं महिलांचे वक्तव्य निषेधार्थ आहे. महायुतीच्या वतीने कालही निषेध केला आणि आजही करतो. वसंतराव देशमुख महायुतीचे घटक नाहीत. केवळ त्या गावातील जेष्ठ आणि थोरात विरोधक म्हणून स्टेजवर आले होते. त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हतं ते स्वतःहून भाषणाला उठले. भाषण करताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही. अशा प्रकारच्या खालच्या पातळीची टीका महायुती स्वीकार करत नाही. गुन्हा दाखल झाला असेल तर कारवाई करा असं देखील आम्ही पोलिसांना सांगितलं आहे.’
मला जीवे मारण्याचा कट असल्याचा दावा सुजय विखेंनी केला. ते पुढे म्हणाले की, ‘मात्र हे सगळं घडल्यानंतर ज्याने वक्तव्य केलं तो बाजूला राहिला आणि पुढच्या १५ मिनिटांत त्या गावच्या एक्झिट पोइंटवर प्रत्येक ठिकाणी शंभर ते दीडशे जणांचा जमाव आला. गाड्या थांबवल्या गेल्या. दगडांनी गाड्या फोडल्या गेल्या. महिलांना हात धरून बाहेर ओढलं गेलं. आज सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर हा मला मारण्याचा पूर्वनियोजित कट होता हे समोर आलं. मी सभेतून निघताना त्यांच्याच यंत्रणेतून मला एकाचा फोन आला. हे असं करणार आहेत तुम्ही या रस्त्याने येऊ नका दुसऱ्या रस्त्याने जा असं त्याने मला सांगितलं. मात्र मी जाण्याआधी ज्या गाड्या निघाल्या होत्या त्या यातून वाचू शकल्या नाही.’
तसंच, ‘माझ्यावरचा हल्ला माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर घेतला. वक्तव्य करणाऱ्याला अटक करा माझं काही म्हणणं नाही. मात्र सर्वसामान्य घरातील महिलांना रात्री गाडीतून बाहेर ओढून हल्ला करता. हे संगमनेरचं खरं चित्र आज महाराष्ट्रासमोर आलं आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही पत्र देऊन तक्रार करणार आहोत. हल्ला होत असताना स्थानिक आमदाराचे भाऊ, स्वीय सहाय्यक, माजी जिल्हा परिषद सदस्य हे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. अशा दहशतीच्या वातावरणात निवडणुका होऊ शकत नाही आणि यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देऊन मार्गदर्शन घेणार आहोत.’, असे सुजय विखेंनी सांगितले.
