Electricity price hike : ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्राला वीज दरवाढीचा शॉक

Electricity price hike: इंधन आणि गॅस दरवाढीमुळं आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्यांना आता वीज कंपन्यांनी आणखी एक मोठा दणका दिला आहे. कारण आता महाराष्ट्रातील(Maharashtra) वीज वितरण कंपन्यांनी प्रतियुनिट वीजेच्या दरात मोठी वाढ केली असून त्याचे नवे नियम आजपासून लागू केले आहेत.

कंपन्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचं कारण देत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, अदानी आणि टाटा पॉवरनं वीजेच्या दरात मोठी वाढ केली असून त्यामुळं आता ऐन उन्हाळ्यात राज्यातील ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. घरगुती वीजदरात तब्बल सहा टक्क्यांची वाढ करण्यात आली असून बेस्टच्या ग्राहकांसाठीही दरवाढ करण्यात आली आहे.

राज्यातील वीज कंपन्यांनी नव्या आर्थिक वर्षामध्ये सरासरी २.९ टक्क्यांची दरवाढ केली आहे. याशिवाय २०२४-२५ साठी ५.६ टक्क्यांची दरवाढ करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी घरगुती वीजेच्या दरात तब्बल सहा टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर बेस्टच्या ग्राहकांसाठी ५.०७ टक्क्यांनी वीज महागली आहे.

त्यामुळं आता आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या सामान्यांना वीज दरवाढीमुळं मोठा आर्थिक शॉक बसणार आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना चालू आर्थिक वर्षामध्ये २.२ टक्के वाढीव दरानं वीज घ्यावी लागणार आहे. याशिवाय टाटा पॉवरने तब्बल ११.९ टक्क्यांनी वीज दरवाढ केली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रात वीज दरवाढ होणार असल्याच्या चर्चा होत्या. यापूर्वी वीज कंपन्यांनी दरवाढीचा प्रस्तावही सादर केला होता. त्यानंतर आता कंपन्यांनी वीजेच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता सामान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

सर्वात महागडी वीज महाराष्ट्रात…

दक्षिणेतील राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच वीज दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर उत्तरेकडील राज्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता महाराष्ट्रात वीज दरवाढ करण्यात आल्यामुळं महाराष्ट्र हे सर्वात महागडी वीज मिळणारं राज्य ठरलं आहे. आंध्रप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्यप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात वीजेचे दर अधिक असणार असल्यामुळं संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment