विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबर हा अखेरचा दिवस होता.
जागावाटप झाल्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी तिढा कायम होता. इच्छुक असूनही उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार बंडखोरी करत अपक्ष मैदानात उतरलेत. त्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर काही ठिकाणी बंड शमवण्यात नेते यशस्वी झालेत. तर काही ठिकाणी अजूनही तिढा कायम आहे.
महायुतीसोबत असलेल्या अजित पवार यांच्यासमोर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक आव्हानं असणार आहे. वेगळी भूमिका घेऊन शरद पवार यांच्यापासून वेगळे झालेले अजित पवार यांच्यासमोर स्वत:ला सिद्ध करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे महायुतीमधील अंतर्गत कलहांना देखील त्यांना सामोरं जावं लागणार आहे. कारण महायुतीत असलेल्या अजित पवार यांच्या उमेदवारांविरोधात महायुतीमधीलच 13 उमेदवारांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केले होते. त्यातल्या पाच उमेदवारांनी माघार घेतली. मात्र अजूनही भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 8 उमेदवार हे अजित पवार यांच्या उमेदवारांच्या विरोधात आहेत.
अजित पवारांच्या कोणत्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी कायम
१) शिवाजीनगर मानखुर्द- नवाब मलिक- बुलेट पाटील (शिवसेना)
२) मोर्शी- देवेंद्र भुयार- उमेश यावलकर(भाजप)
३) आष्टी- बाळासाहेब आजबे- सुरेश धस (भाजप)
४) देवळाली – सरोज अहिरे- राजश्री आहेर (शिवसेना)
५) वांद्रे पूर्व- जीशान सिद्धकी- कुणाल सरमळकर (शिवसेना)
६) अमळनेर- अनिल पाटील- शिरीष चौधरी (भाजप )
७) अमरावती- सुलभा खोडके- जगदीश गुप्ता (भाजप )
८) जुन्नर- अतुल बेनके- आशा बुचके (भाजप )
