वाशीम : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विविध कारणास्तव चर्चेचं कारण ठरत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले.
तर शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे देखील अडचणींत सापडले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
अशात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखी एका बड्या मंत्र्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. पालकमंत्री पदाचं वाटप होताना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं होतं. मुश्रीफ हे मूळचे कोल्हापूरातील कागल येथील आहेत, त्यामुळे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद त्यांना मिळावं, यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती.
मात्र त्यांना कोल्हापूर पासून ६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. हे पद मिळाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून ते भाजपसह आपल्याच पक्षश्रेष्ठींविरोधात नाराज होते. आज अखेर त्यांची नाराजी उफाळून आल्याचं बोललं जातंय. हसन मुश्रीफ यांनी वाशीमच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. कोल्हापूर ते वाशिममध्ये 600 किलोमीटरहुन अधिक अंतर आहे. त्यांना प्रवासासाठी हा जिल्हा अडचणीचा ठरत आहे, याच कारणातून त्यांनी हे पालकमंत्रीपद सोडल्याची माहिती समोर येत आहे.
खरं तर, सध्या महायुतीत पालकमंत्री पदाचा तिढा सुरू आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये वाद सुरू आहे. या दोन्ही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गटात वाद आहेत. हा वाद सुरू असताना हसन मुश्रीफ यांनी अचानक वाशीमच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का? याबाबतही तर्क वितर्क लढवले जात आहेत.
