मुंबई – राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासह विविध मागण्यासाठी हे उपोषण सुरू होते, गेल्या 2 दिवसांपासून या आंदोलनाची आक्रमकता वाढली होती, उच्च न्यायालयानेही राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते.
गेल्या 5 दिवसांपासून राज्याचं लक्ष लागलेल्या या आंदोलनाची अखेर आज सांगता झाली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी उपोषण सोडले, तत्पूर्वी सर्व मागण्याचे शासन निर्णय जरांगे पाटील यांना देण्यात आले होते.
जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने शासन निर्णय जारी केले, त्यानंतर आझाद मैदानात एकच जल्लोष झाला, मनोज जरांगे पाटील यांनीही शासनाचे आभार मानले. मात्र, आनंदोत्सव साजरा करताना पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले
आझाद मैदानात सगळीकडे विजयाचा, आरक्षणाचा लाभ मिळाल्याचा आणि शासन निर्णय हाती पडल्याचा आनंदोत्सव सुरू होता. मात्र, त्याचवेळी जरांगे पाटलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले, ते पाहून आझाद मैदानही गहिरवल्याचं दिसून आलं.
जरांगे पाटलांच्या खांद्यावर हात ठेऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, मैदानावरील स्टेजवर गणपतीची आरती करुन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषही झाला.
राजेहो तुमच्यामुळे जिंकलो, आपल्या मागण्या मान्य झाला असे म्हणताच आझाद मैदानासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा बांधवांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गुलालाची उधळण करत आरक्षण आंदोलनाचा विजयोत्सव झाला
दरम्यान, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी सरकारला 2 महिन्यांची मुदत देण्यात आली असून उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईत आलेल्या सर्व आंदोलकांना गावाकडे जाण्याचे, शांततेत राहण्याचे आवाहन केलं आहे.
