शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी, आंदोलनाला मोठं यश – संतोष वाडेकर 

मुंबई(DSNews24 /किरण पुरी) कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार रुपयांचे मानधन, तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय हक्कांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे आंदोलन पुकारले होते. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले होते. बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात मंगळवारपासून चक्काजाम आंदोलन सुरू केलं होते. या आंदोलनाला भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो भूमिपुत्र आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनाची तीव्रता बघता सरकारने आंदोलनाची दखल घेत सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळ सोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री केली असून या आंदोलनाला मोठं यश मिळाल असल्याची माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिलीय.

तसेच “कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळ सोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री दत्तामामा भरणे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश कुमार, शेतकरी आंदोलन शिष्टमंडळातील प्रतिनिधी माजी राज्यमंत्री ओमप्रकाश बच्चू कडू, खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर, वामनराव चटप, रविकांत तुपकर, राजन क्षीरसागर, गिरीश दाभाडकर, अजित नवले यांच्यासह सर्व प्रमुख विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, “नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे, कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही. म्हणून आता 32,000 कोटींच्या पॅकेज वितरण याला प्राधान्य आहे. पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून 32 हजार कोटी रूपये मदत दिली जात आहे. आत्तापर्यंत 8000 कोटी रुपये खात्यात दिले गेले आहेत. या आठवड्याअखेर 18,500 कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात 90 टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम जाईल या दृष्टीने तरतूद केली असून निर्देश दिले आहेत.”

मुख्यमंत्री म्हणाले,” आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा निर्णय होता. पण ही तात्कालिक बाब आहे. दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. कर्जाची वसुली जूनपर्यंत होते, त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे. याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे ”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

▪️कर्जमाफी कशी करायची याबाबत एप्रिलपर्यंत समिती शिफारस करेल

▪️शिफारशीच्या आधारावर पुढच्या तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करणार

▪️नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक

▪️रब्बीची पेरणी करता यावी, म्हणून आता 32,000 कोटींच्या पॅकेज वितरणास प्राधान्य

▪️विविध विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार

Leave a Comment