मोठी बातमी! बाळासाहेब थोरात थेट राज्यसभेवर?

आगामी काळात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागासाठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच राज्यभरातील घडामोडींना वेग आला आहे. रिक्त होत असलेल्या सात जागांपैकी सहा जागा महायुतीच्या वाट्याला येणार आहेत तर एकमेव जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. त्यातच आता या एकमेव जागेसाठी आघाडीतील मित्र पक्ष असेलल्या काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.

विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जागा रिक्त होणार असल्याने या जागेवर त्यांचा दावा आहे. त्यातच आता काँग्रेसदेखील या जागेसाठी प्रयत्नशील असून त्यासाठी भेटीगाठी घेतल्या जात आहेत. काँग्रेसकडून या जागेसाठी सलग 8 टर्म आमदार असलेल्या एका बड्या नेत्याचे नाव चर्चेत असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

येत्या काळात होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी सात जागेसाठी सात जणांची नावे आल्यास ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार विचार केल्यास रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या सात जागांपैकी सहा जागा महायुतीला मिळणार आहेत. त्यामध्ये भाजपला ४ तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेच्या वाट्याला एक तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीला येत असलेल्या एका जागेसाठी तीन पक्षात चुरस आहे. त्यामुळे मविआतील कोणत्या पक्षाला जागा सुटणार यावरून उमेदवार ठरणार आहे.

आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या रिंगणात उतरल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उमेदवार दिल्यास महायुतीकडून सातवा उमेदवार दिला जाऊ शकतो. त्या स्थितीत क्रॉस व्होटिंगचा धोका आहे. शरद पवार राज्यसभेवर जाण्यासंदर्भात अद्याप तरी जाहीरपणे काहीही बोलले नाहीत. त्यामुळे या एकमेव जागेबतचा सस्पेन्स कायम आहे.

या जागेसाठी दुसरीकडे काँग्रेसदेखील प्रयत्नशील आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी याबाबत उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन मंगळवारी भेट घेतली आहे. राज्यातील काँग्रेसमधील बहुतांश नेते राज्यसभेची जागा आपल्याकडे राहावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. शरद पवार यांच्या सोबतच ठाकरेसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. चतुर्वेदी यांनी पुन्हा एकदा संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लॉबिंग सुरु केले आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील ही जागा त्यांच्या वाट्याला यावी, यासाठी जोर लावला आहे.

काँग्रेसकडून या पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना राज्यसभेवर पाठवायच्या विचारात आहे. मुंबईत काँग्रेस नेत्याची एक बैठक झाली. त्या बैठकीत थोरात यांच्या नावासंदर्भात चर्चा झाली. थोरात नुकतेच दिल्लीला जाऊन आले आहेत. संसदेचं कामकाज कसे चालते याचा अनुभव त्यांनी नुकताच घेतला. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य असलेल्या बाळासाहेब थोरात यांना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार पक्षातून सुरु असल्याचे समजते.

बाळासाहेब थोरात हे 1985 ते 2024 अशी सलग 39 वर्षे ते आमदार राहिले आहेत. 1985 मध्ये ते संगमनेरमधून पहिल्यांदा अपक्ष म्हणून विजयी झाले. त्यानंतर ते सातत्यानं काँग्रेसकडून निवडून आले. 2024 मध्ये त्यांचा पराभव झाला. मुत्सद्दी, अजातशत्रू नेते अशी त्यांची ओळख आहे. काही काळ त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले आहे. त्याशिवाय राज्य मंत्रिमंडळात त्यांनी महसूलसारखी महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. त्यामुळे थोरात यांना संधी दिल्यास पक्षाला राज्यात फायदा होईल, असे काँग्रेस पक्षातील धुरीणींना वाटते. त्यामुळे सध्या त्यांचे नवा काँग्रेसकडून आघाडीवर असल्याचे समजते.

Leave a Comment