केंद्र सरकारने गुरुवारी रात्री उशीरा देशातील 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. या 9 राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून आता महाराष्ट्राचं राज्यपाल पद जिष्णु देव वर्मा यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या कार्यालयांमधून या नियुक्त्यांसंदर्भातील पत्रक जारी करण्यात आलं आहे. राष्ट्रपतींनी पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.
कोणकोणत्या राज्यांचे राज्यपाल बदलले?
महाराष्ट्रासह 9 राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून यामध्ये तेलंगण, नागालँड, बिहार, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, लडाख आणि दिल्लीचा समावेश आहे. जिष्णु देव वर्मा यांचा त्रिपुरा राजघराण्याशी संबंध आहे. राजकुमार रामेंद्र किशोर देव वर्मा आणि महाराजकुमारी कमल प्रवा देवी यांचे पुत्र आहेत. जिष्णु देव वर्मा हे सांस्कृतिक, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील योगदानासाठीही ओळखले जातात. नियुक्तीनंतर जिष्णु देव वर्मा यांनी राष्ट्रपती मुर्मूंबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत.
राजकीय प्रवास
जिष्णु देव वर्मा यांनी 1990 च्या सुरुवातीला भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. त्या काळात संपूर्ण त्रिपुरामध्ये राजकीय प्रभाव कम्युनिस्ट पक्षाचा होता. संपूर्ण राज्य त्यांच्या ताब्यात होते. तरीही वर्मांनी पक्षाच्या प्रति निष्ठा ठेवल्याचे दिसून आले. 2018 ते 2023 या काळात ते त्रिपुराचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी अर्थसंकल्प, ग्रामीण विकास, वीज यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चारिलम मतदारसंघातून पराभव झाला.
सांस्कृतिक आणि सामाजिक योगदान
जिष्णु देव वर्मा हे साहित्य आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी ओळखले जातात. ते लेखक आणि कवी म्हणून उत्तर-पूर्व भारतात प्रसिद्ध आहेत. त्यांनी 1990-1993 दरम्यान भारताच्या बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यांचा सांस्कृतिक सहभाग ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँण्ड कल्चरल हेरिटेज’बरोबरच ‘नॉर्दन इस्टर्न काऊन्सिल’च्या कल्चरल अॅडव्हायजर कमिटीमध्ये दिसून येतो. जिष्णु देव वर्मा यांच्या नियुक्तीमुळे त्रिपुराचे स्थानिक राजकीय नेतृत्व आता राष्ट्रीय आणि प्रशासनिक पातळीवर दिसून येईल.
