पठारभागात खळबळ! लग्नाला नकार दिल्याने तरुणीवर हल्ला, अन् हल्लेखोराचही भयानक कृत्य….

संगमनेर – लग्नाला नकार दिला म्हणून तरुणाने तरुणीच्या अंगावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. यानंतर तरुणानेही आपल्याच गळ्यावर चाकूने वार करत शेततळ्यात उडी घेतली. ही धक्कादायक घटना संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील रणखांब येथे सोमवारी (दि. १६) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, काल सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास रणखांब येथील एकवीस वर्षीय तरुणी, तिचे आजोबा आणि आजी घरात जेवण करत होते तर आई घराबाहेर कपडे धुवत होती. त्याचवेळी जनार्दन गोरक्षनाथ साळवे (वय २८, रा. पिंपरणे) हा तरुण तेथे आला आणि लग्नाला नकार दिला म्हणून चाकूने तरुणीच्या अंगावर वार केले. तरुणीचे आजोबा आणि आजी यांनी सोडवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, गंभीर वार झाल्याने तरुणी रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली होती.

या घटनेची माहिती समजताच पोलीस पाटील साहेबराव बारवे, सरपंच बाबाजी गुळवे, नानासाहेब गुळवे, किरण गुळवे, राहुल शेजवळ, बाबासाहेब गुळवे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक सुरेश टकले, पोहेकॉ. प्रमोद गाडेकर, पोकॉ. महादेव हांडे आदींनी घटनास्थळी धाव घेत तातडीने तरुणीला औषधोपचारांसाठी संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, तरुण जनार्दन साळवे यानेही चाकूने गळ्यावर वार करून घेत पळून जाताना शेततळ्यात उडी मारली. परंतु, ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढले. याप्रकरणी तरुणीच्या आईने घारगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन जनार्दन साळवे याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात हे स्वतः करत आहे.

Leave a Comment