अहिल्यानगर – जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मंगळवार, बुधवार आणि गुरूवार अशा तीन दिवस सलग झालेल्या पावसामुळे आलटून पालटून जवळपास नगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यात अवकाळीने उघडीप दिलेली असतांना आता पुन्हा भारतीय हवामान खात्याने नगर जिल्ह्यात सोमवार (दि.23) रोजी पावसाचा यलो अर्लट तर मंगळवारी वादळी वार्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाटचा इशारा दिला आहे.
गेल्या वर्षी नगर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. विशेष करून दक्षिण जिल्ह्यात त्याचे प्रमाण अधिक होते. त्यानंतर पुन्हा उन्हाळ्याच्या तोेंडावर जिल्ह्यात पुन्हा बेमोसमी मान्सून पूर्व पावसाने जिल्ह्यात बरसण्यास सुरूवात केली आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाचा फिल नगरकर घेतांना दिसत आहेत. जिल्ह्यात मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर बुधवार (दि.18) रोजी नगर, पाथर्डी, राहुरी, नेवासा, अकोले आणि राहाता तालुक्यातील 41 गावात 7 हजार 352 शेतकर्यांचे 3 हजार 558 हेक्टरवरील पिकांचे तर गुरुवारी (दि. 19) रोजी पारनेर, पाथर्डी, कर्जत, श्रीरामपूर, शेवगाव आणि संगमनेर तसेच राहाता तालुक्यातील 103 गावात 12 हजार शेतकर्यांचे 8 हजार हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले.
आता पुन्हा पुढील आठवड्याची सुरूवात बेमोसमी पावसाने होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नगर जिल्ह्यात पावसाचा यलोअर्लट नोंदवण्यात आला असून त्यानंतर पुन्हा मंगळवार (दि.24) रोजी पावसाचा अर्लट दिला नसला तरी वादळी वार्यासह ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाटचा इशारा दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातरण आहे.
