हवामान विभागाकडून, गुरुवारी संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. पण हा पाऊस सार्वत्रिक नाही तो काही भागातच बरसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वदूर जोरदार पावसाची आजही प्रतिक्षा आहे.
हवामान विभागाने उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
यासोबत उद्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांना काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
