राज्यातील ‘या’ भागात पुढील पाच दिवस बरसणार अवकाळी पाऊस

Weather Update : राज्यातील काही भागांमध्ये थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून आजपासून पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून किनारपट्टी भागातून हा पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे. तर तीन दिवसांपूर्वी उपनगरातील किमान तापमान २१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. मात्र, मंगळवारी त्यात वाढ झाली. त्यामुळे उद्यापासून (दि.२४ नोव्हेंबर) मुंबईच्या आकाशात ढग जमा होऊ शकतात.

तसेच २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय मुंबईत पावसाचा अंदाज असल्याने हवा गुणवत्ता पातळी चांगली होण्याची शक्यता आहे.

तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळले. तर उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता असून रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांचा पुन्हा अवकाळीशी सामना होणार आहे.

दरम्यान, आजपासून राज्याच्या दक्षिणकडे असलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment