अकलूज येथे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा वाढदिवसानिमित्त व महाविकास आघाडीच्या खासदारांचा सत्कार सोहळा मोहिते कुटुंबाकडून आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबरचे अनेक किस्से सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले. शरद पवार यांचे पंतप्रधानपद जवळ आले होते. पण ते कसे हुकले याची सलही सुशीलकुमार शिंदे यांनी बोलून दाखविली.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, शरद पवार हे संरक्षणमंत्री होते. त्यावेळी पंतप्रधान नरसिंह राव यांनी सुशीलकुमार शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायची इच्छा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यावेळी पवार हे पाच जनपथवर राहत होते. आम्ही रात्री साडेआठला बसलो. मुख्यमंत्रीपदावर माझे नाव होते. मंत्र्यांची यादी तयारी केली. यादी खिशात घेऊन निघालो. मला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात जायला सांगितले. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची शपथ घ्या म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी नरसिंह राव यांचा फोन आला. महाराष्ट्राला शरद पवार यांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्रात आले. माझ्या मनात पाल चुकचुकते की त्यावेळी शरद पवार यांनी ‘तो’ निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते. पण कधी-कधी हा नियतीचा खेळ असतो, असेही शिंदे म्हणाले.
