महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाची त्सुनामी पाहायला मिळाली. महायुतीच्या या विजयाचं दिल्लीतही सेलिब्रेशन पाहायला मिळाली.

या निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खूश केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानले. हा निकाल हा महाराष्ट्रात घराणेशाहीचा पराभव असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तसेच यावेळी ‘एक है तो सेफ है, असा पुन्हा एकदा नारा मोदींनी दिला.

महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीतील आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आज आपण आणखी एका ऐतिहासिक विजयाचा उत्सवासाठी आलो आहोत. आज महाराष्ट्रात विकासवादाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात सुशासनाचा विजय झाला आहे. तिथे सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात असत्य हरलं आहे. आज नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला आहे. आज घराणेशाहीचा पराभव झाला आहे’.

‘आज महाराष्ट्राने विकसित भारताच्या संकल्पनेला ताकद दिली आहे. मी देशभरातील भाजप, एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार मानून अभिनंदन करतो. मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं कौतुक करतो. मित्रांनो, आज देशातील अनेक राज्यात पोटनिवडणुकांचेही निकाल आले आहेत. लोकसभेचीही आमची एक सीट वाढली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानने भाजपला समर्थन दिलं आहे. आसामच्या लोकांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे’, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

हरियाणानंतर महाराष्ट्रातील निवडणुकीच्या निकालाने महत्वाचा संदेश दिला आहे. एक है, तो सेफ आहे, असा संदेश निकालाने दिला आहे. हा नारा देशाचा महामंत्र झाला आहे. काँग्रेसने संविधान, आरक्षणाच्या नावाने खोटं बोलून एससी, एसटी आणि ओबीसीला विभागण्याचा त्यांचा डाव होता. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या डाव उधळून लावला आहे, असे मोदी पुढे म्हणाले.

Leave a Comment