देवेंद्र फडणवीस बसायला गेले अन् खुर्चीच मोडली, नेमकं कुठ घडली घटना.. 

बिहारच्या (Bihar) खगडिया जिल्ह्यात निवडणूक प्रचारादरम्यान एक मोठी घटना घडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान मंचावर बसताना तेथील खुर्ची अचानक तुटली.

यामुळे व्यासपीठावर क्षणभर गोंधळ उडाला. पण सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. फडणवीस आणि पासवान यांनी उपस्थितांना अभिवादन करून आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. या घटनेनंतर, तात्काळ दुसरी खुर्ची मागवण्यात आली आणि जाहीर सभेचे कामकाज पुढे सुरू ठेवण्यात आले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) स्टार प्रचारक म्हणून बिहारमध्ये दाखल झाले आहेत.

बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या (Bihar Election 2025) पहिल्या टप्प्यापूर्वी एनडीएची प्रचारमोहीम वेग पकडत आहे. रविवारी खगडिया जिल्ह्यातील परबत्ता विधानसभा क्षेत्रात एनडीए उमेदवार बाबूलाल शौर्य यांच्या समर्थनार्थ आयोजित भव्य सभेत अनपेक्षित असा प्रसंग घडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे मंचावर पोहोचले आणि खुर्चीवर बसत असतानाच तेथील खुर्ची अचानक तुटली.

फडणवीसांचे उपस्थितांना अभिवादन

या प्रसंगाने काही क्षणांसाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. या घटनेनंतर आयोजकांनी त्वरित नवीन खुर्च्या आणून कार्यक्रम पुन्हा सुरू केला. फडणवीस आणि पासवान यांनी या घटनेला हलक्याफुलक्या अंदाजात घेतले, लोकांना हात हलवून अभिवादन केले आणि आपली भाषणे सुरू ठेवली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘बिहारची जनता आता विकासाची अपेक्षा करते, आणि एनडीएच ती दिशा देऊ शकते. महागठबंधनने गेल्या काळात फक्त भ्रष्टाचार आणि घराणेशाही वाढवली आहे,’ असा हल्लाबोल त्यांनी केला. तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले की, ‘महागठबंधन हे केवळ सत्तेसाठी तयार केलेली संधीसाधू आघाडी आहे, ज्यांना जनतेच्या हिताचे काही देणेघेणे नाही,’ असे त्यांनी सांगितले.

सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंचावरच्या या छोट्याशा अपघातानंतरही नागरिकांचा उत्साह कमी झाला नाही. हजारो समर्थकांनी ‘एनडीए झिंदाबाद’च्या घोषणांनी वातावरण दणाणून सोडले. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, मंचावर खुर्ची तुटल्याचा आवाज होताच काही क्षणांसाठी सगळे स्तब्ध झाले, पण लगेचच सर्व काही सामान्य झाले. नेत्यांच्या विनोदी स्वभावामुळे वातावरण पुन्हा आनंदी बनले.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय

कार्यक्रमानंतर या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. काही युझर्सने यामागे आयोजकांची मंच व्यवस्थेतील निष्काळजीपणा असल्याचे म्हटले. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, निवडणूक सभांमध्ये अशा प्रकारच्या तांत्रिक आणि सुरक्षा त्रुटी गंभीर ठरू शकतात, कारण त्यातून नेते आणि उपस्थित जनतेचा जीव धोक्यात येऊ शकतो. तरीदेखील या घटनेने परबत्ता मतदारसंघातील एनडीएच्या प्रचारात नवचैतन्य निर्माण केले आहे.

Leave a Comment