विधानपरिषदेच्या जागांवरून एकीकडे महायुतीत ओढाताणी सुरू आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र, जागावाटप जाहीर करून टाकलंय. विधानपरिषदेच्या सर्व 17 जागा महविकास आघाडी लढणार आहे.
मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत समन्वयानं हे जागावाटप करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांनी एकमतानं जागांवर निर्णय घेतला आहे. काँग्रेस 8 जागांवर लढणार आहे, ठाकरेंची शिवसेना 6 आणि पवारांची राष्ट्रवादी ही 3 जागांवर उमेदवार देणार आहेत.
सोलापूरची जागा काँग्रेस लढवणार, अहिल्यानगर काँग्रेस, यवतमाळ काँग्रेस, भंडारा-गोंदिया काँग्रेस, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती काँग्रेस, धाराशिव-लातूर-बीड काँग्रेस, नागपूर काँग्रेस तर ठाकरेंची शिवसेना जळगाव, नांदेड, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, संभाजीनगर तर राष्ट्रवादी ठाणे, सांगली-सातारा, आणि पुण्याची जागा लढवणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महायुती मविआवर भारी पडलीय. त्यामुळे महायुतीकडे संख्याबळ जास्त आहे, तुलनेत मविआ पिछाडीवर असली तरी त्यांनी 17ही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय.
