मुंबई – राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर वेगाने वाढू लागला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी ३१ जुलैपर्यंत राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतः घाट परिसर आणि किनारपट्टीवर हवामान विभागाने विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्यभरात पाऊस धुमाकूळ घालणार?
३० जुलै रोजी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही पावसाचे स्वरूप तीव्र असणार असून, काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरातही मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी बरसतील.
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणता अलर्ट?
या वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील एकूण ३१ जिल्ह्यांना विविध चेतावणी दिली आहे. यात ११ जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ तर २० जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रायगड, जळगाव, पुणे, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांचे घाट परिसर, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीसह इतर जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला गेला आहे. मुंबई महानगर क्षेत्रातही पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
