शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केले आहे. सर्व बाजूंचा विचार केला तर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरू शकतात. पण त्याबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधीमंडळाचा आहे.
त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही. तो निर्णय किती वेळात होईल हे महत्वाचे नाही. कधी ना कधी त्याबाबत निर्णय होणारच असे मत विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणीत आगामी काळात वाढ होऊ शकते असा सुचक इशारा त्यांनी दिला आहे.
ते रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या निर्णयाकडे संपर्ण देशाचे लक्ष आहे. आज ना उद्या याबाबत निर्णय घ्यावाच लागणार आहे. तो किती वेळात हे महत्वाचे नाही. हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असणार आहे. त्यावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र सर्व बाजूंचा विचार केला तर अपात्रता झाली आहे असे सूचक वक्यव्य झिरवळ यांनी केले आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आगामी काळात १६ शिवसेना आमदारांच्या अडचणीत वाढ होऊ शकते असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
