मुसळधार पाऊस! शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

रायगड – राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी रायगडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

रायगड जिल्ह्यात मागील 24 तासांपासून पाऊस सुरू असल्याने पाताळगंगा, सावित्री, अंबा नद्यांना पूर आला आहे. तर पावसाचा जोर वाढत असल्याने कुंडलिका नदी ही धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.

ही बाब लक्षात घेता खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. याशिवाय मासेमारी आणि इतर कारणासाठी नदीकाठी न जाण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, पाताळगंगा नदीपात्रात सोमवारी मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आहे. तहसीलदार आयुब तांबोळी यांनी किनाऱ्यावरील रहिवासी भागाची पाहणी केली. पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत काही ठिकाणी दीड ते दोन फूट पाणी साचल्याने दुचाकीस्‍वारांना कसरत करावी लागली. ही बाब लक्षात घेता खबरदारी म्हणून आज बुधवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

Leave a Comment