इंदापूर विहीर दुर्घटना : तब्बल ६८ तासांनंतर चौघांचे मृतदेह सापडले…..

तब्बल 68 तासांच्या अथक परिश्रमानंतर इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीतील विहिरीतून एनडीआरएफच्या जवानांना आज (शुक्रवार) चारही मजूरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

दरम्यान या दुर्घटनेत बळी पडेल्या चाैघा मजूरांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्याची घाेषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना मंळगवारी (ता. एक आॅगस्ट) मातीचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत बेलवाडी गावातील चार मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले हाेते. आज (शुक्रवार) दुपारी चाैघा मजूरांचे मृतदेह हाती लागल्यानंतर ते थांबविण्यात आले.

या दुर्घटनेतील पहिला मृतदेह तब्बल 65 तासांनी सापडला होता. त्यानंतर दीड तासाने अन्य दोन मजुरांचा तसेच तासाभराच्या अंतराने चाैथ्या मजूराचा मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागला. सर्व मृत कामगार इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावचे आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार या दुर्घटनेत सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 32), जावेद अकबर मुलाणी (वय 30), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय 30) आणि मनोज ऊर्फ लक्ष्मण मारुती सावंत (वय 40) यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान आज (शुक्रवार) विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत देण्याची घाेषणा केली.

Leave a Comment