राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सोमवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही महत्वाची बैठक पार पडली.
आज दिल्लीतच भाजपा प्रणीत NDA ची महत्वाची बैठक होणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि गोव्याच्या 48 खासदारांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याआधी काल शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंडाच निशाण फडकवलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. हा गट सत्तेत सहभागी झाला आहे. त्याचवेळी शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात आहे. शरद पवार गटातील आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळेच त्यांना विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला सोडाव लागलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सद्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महत्वाच वक्तव्य केलं आहे. “मी कधीच कॉम्प्रोमाईज करणार नाही. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही. आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जा” असा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला. मनात संभ्रम न ठेवता काम करा असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या भूमिकेवरुन नेहमीच विरोधकांकडून राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. मागच्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होते. त्यावरुन विरोधक शरद पवार यांना लक्ष्य करत आहेत. त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय
