गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर वारंवार वाढत आहेत. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी 70 ते 80 रुपये किलोने विकला जात आहे.
गेल्या आठवड्याभरातच कांद्याची किंमत 15 ते 20 रुपयांनी वाढली आहे. येत्या काळात कांद्याची किंमत 100 रुपयांवर जाणार असल्याची चर्चा आहे.
ऐन सणासुदीत कांद्याचे दर वाढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 40 टक्के शुल्काचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदाच होणार आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 40 टक्के शुल्क रद्द केलं आहे. तसा जीआरच केंद्र सरकारने काढला आहे. डिसेंबर अखेर 800 डॉलर प्रति टन किमान निर्यात शुल्क राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांना कांदा निर्यात करायचा आहे, ते करू शकतात. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.
देशातील बाजारांमध्ये कांद्यांची आवक वाढवण्यासाठी आणि कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या होत्या. त्यामुळे सर्वांचं कंबरडं मोडलं होतं. वाढत्या महागाईमुळे गृहिणींचं बजेटही कोलमडलं होतं.
