BREAKING! एक्झिट पोलचे निकाल येताच बाळासाहेब थोरात – जयंत पाटील एक्शन मोडमध्ये…..

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सचे निकाल समोर आले होते. यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला संमिश्र कौल मिळाल्याने संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती.

या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीने फासे टाकायला सुरुवात केली आहे. राज्यात कोणत्याही आघाडीला बहुमत न मिळाल्यास अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरु शकते. त्यामुळे आता महाविकास आघाडीने बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे.

मतदान संपल्यानंतर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. तर दुसरीकडे गुरुवारी सकाळपासून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत. बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांच्या माध्यमातून जे बंडखोर विजयी होऊ शकतात, त्यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात झाली आहे. मविआच्या नेत्यांनी निकालापूर्वीच बंडखोर आणि अपक्षांशी संपर्क साधायला सुरुवात केल्याने महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे हा वाढीव टक्का कोणासाठी फायदेशीर ठरणार, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर झाल्यास कोणालाही बहुमत मिळणार नाही, अशाप्रकारचेही अंदाज व्यक्त केले जात आहेत.

अशावेळी बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या 145 जागा गाठण्यासाठी अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरु शकते. केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे अपक्षांचा ओढा साहजिकच महायुतीकडे असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीने आतापासूनच अपक्ष आणि बंडखोरांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता येत्या काही तासांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Comment