मुंबई – जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारीत ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. कारण तांत्रिक कारणांमुळे 24 नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे सर्वच नगरपालिकांचे निकाल आता उशिरानं लागणार आहेत. त्यामुळे आयोगाच्या यंत्रणेवरील ताण वाढलाय. तसंच नगरपालिका निवडणुकांनंतर महापालिका निवडणुका प्राधान्यानं घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीला ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकीकडे राज्यातील नगर पालिकांच्या निवडणुकांचं मतदान आज मंगळवारी पार पडलं. या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. नगर पालिकांच्या निवडणुकीनंतर आता राजकीय नेत्यांसहित लोकांनाही महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. नगरपालिकांच्या निवडणुकानंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका कधी लागणार, याचा प्रश्न अनेकांना पडला आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाकडून महापालिकांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत पार पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
२०१७ सालापासून रखडलेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला आता वेग आलाय. राज्य निवडणूक आयोगाने ४ डिसेंबरला महत्त्वपूर्ण बैठक बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सर्व महापालिकांचे आयुक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सर्व प्राप्त सूचना आणि हरकतींचे १० डिसेंबरपर्यंत निरसन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. तर जानेवारीत महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या वर्षांत राजकीय पक्षांच्या नेत्यांना निवडणुकीसाठी धावपळ करावी लागणार आहे.
पालिकेचे निकाल रखडल्यानं झेडपी लांबणीवर?
नगरपालिकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदानानंतर उमेदवारांना तब्बल १९ दिवस वाट पाहावी लागणार आहे. नगरपालिकांच्या निवडणुकींचा निकाल लांबणीवर गेल्याने जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर गेल्याचं सांगण्यात येत आहे.
